भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने बुधवारी मोठे यश मिळवले. चंद्रयान-३ मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला. भारताच्या 'चंद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. दरम्यान, चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे ते म्हणाले.
दक्षिण अफ्रिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदीनी इस्रोच्या मोहिमेत व्हर्चुअली उपस्थिती दर्शविली. यावेळी ते म्हणाले, "भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, अडचणींचा महासागर पार करण्याचा हा क्षण आहे. १४० कोटी लोकांचं स्वप्न आज पूर्ण झाले आहे. हा भारताचा शंखनाद आहे. आज प्रत्येक देशवासीयाप्रमाणेच माझेही मन या चंद्रयान ३ च्या मोहिमेकडेच जोडले गेले होते. "याचबरोबर, आपण सगळे चंद्राला मामा म्हणतो. चंद्र खूप लांब आहे, असं म्हणायचो. पण आता देशातील मुलं म्हणतील चंद्र मामा एक टूर के हैं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान-३ हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एक-एक टप्पा पार करत चंद्रयान-३ हे चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा चौथा देश ठरला आहे.