राजेंद्र पाराशर, भोपाळमध्यप्रदेशातील दुहेरी रेल्वे अपघात मुसळधार पावसामुळे झाल्याचे मानले जात असले तरी नर्मदेवरील धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने ही भीषण घटना घडली असण्याची शक्यता अधिक आहे. नर्मदा नदीवरील धरणातून सतत पाणी सोडण्यात येत असल्याने तिच्या उपनद्यांमधील पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी उपनद्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातामागेही नदीत अचानक वाढलेली पाण्याची पातळी हेच मूळ कारण असावे. या पाण्यामुळे रेल्वेरुळावरील माती खचली आणि अपघात झाला. नर्मदेवर बांधण्यात आलेल्या धरणांमधून (जबलपुरातील बरगी, होशंगाबाद जिल्ह्यातील तवा) सतत सोडण्यात येणारे पाणी आणि इंदिरा सागर व ओंकारेश्वर धरणात होणारा जलसाठासुद्धा अपघातास कारणीभूत ठरला आहे. अपघाताच्या वेळी बरगी धरणातून पावणेसात मीटर, तर तवामधून दोन मीटर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेच्या उपनद्यांमधील बॅक वॉटर वाढले आहे. हेच बॅक वॉटर रेल्वेमार्गाची जमीन ठिसूळ करीत आहे. हरदाजवळ ही घटना घडली ते स्थळसुद्धा काली माचक नदीच्या जवळ आहे. पावसाळ्यात या नदीतील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असते. सरकार हे संपूर्ण बुडीत क्षेत्र मानत नसले तरी हरदा जिल्ह्यातील अनेक गावे आजही बुडीत क्षेत्रात येतात; परंतु सरकारला अद्याप याचे गांभीर्य उमजलेले नाही. गावकऱ्यांनी यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले आहे.कसा झाला अपघात?मंगळवारी रात्री ११.३० वाजता सर्वप्रथम मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्स्प्रेस पुलावरून गेली. जमीन खचल्याने रेल्वेमार्ग तुटला आणि ११ डबे रुळावरून खाली घसरले. ६ डब्यांचे अधिक नुकसान झाले. त्यानंतर २० मिनिटांनी म्हणजे ११.५० वाजता पुलावरीलच दुसऱ्या रेल्वे रुळावरून आलेल्या पाटणा-मुंबई जनता एक्स्प्रेसचेही ९ डबे आणि इंजिन अपघातग्रस्त झाले. या गाडीचे चार डबे उद्ध्वस्त झाले.
नर्मदेच्या बॅक वॉटरने केला घात
By admin | Published: August 05, 2015 11:29 PM