ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १० - बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. २० नोव्हेंबररोजी नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असून नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळात लालूप्रसाद यादव यांचेच वर्चस्व असेल असे दिसते. जंबो मंत्रिमंडळात राजद १६, जदयूचे १४ आणि काँग्रेसच्या ५ आमदारांचा समावेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बिहारमध्ये जदयू, राजद व काँग्रेस यांच्या महाआघाडीने एकतर्फी विजय मिळवत भाजपाचा धूव्वा उडवला आहे. आता महाआघाडीत मंत्रिमंडळावर चर्चा सुरु झाली असून सोमवारी दिवसभर तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक पार पडली. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजदने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला असून त्याचे प्रतिबिंब मंत्रिमंडळातही दिसून येणार आहे. प्रत्येक पाच आमदारामागे एक मंत्री असे सूत्र मंत्रिमंडळात वापरले जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार व त्यांच्या सहका-यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. विशेष बाब म्हणजे तब्बल २५ वर्षांनी बिहारमधील मंत्रिमंडळात काँग्रेसचा समावेश होणार आहे.पाटण्यातील गांधी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडेल.