Ram Mandir Inauguration: एकीकडे श्रीराम जन्मभूमी अयोध्येत रामललाच्या प्रतिष्ठापणेची जय्यत तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध मंदिरात जाऊन पुजा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (16 जानेवारी) आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात दर्शन घेतले.
मंदिरात दर्शन केल्यानंतर पीएम मोदींनी नॅशनल अॅकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स (एनएसीआयएन) चे उद्घाटन केले. यावेळी जनतेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, 'सध्या संपूर्ण देश राममय झाला आहे. महात्मा गांधीदेखील रामराज्याबद्दल बोलायचे. रामललाच्या अभिषेकापूर्वी मी 11 दिवस उपवास करत आहे. प्रभू रामाचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलीकडे आहे. प्रभू राम हे समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक आहेत.'
'भगवान राम त्यांचा भाऊ भरतला म्हणाले होते की, मला विश्वास आहे तू वेळ न घालवता कामे पूर्ण करतोस आणि यामुळए खर्चही कमी होतो. गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारदेखील अशाचप्रकारे आपल्या खर्चाकडे लक्ष देत आहे. आम्ही जीएसटीच्या रुपाने देशाला एक नवीन आधुनिकता दिली. आम्ही 7 लाख रुपयांपर्यंत करात सूट दिली. यामुळे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांचा कर वाचला. आज देशातील करदात्याला आपल्या कराचा योग्य वापर झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे ते पुढे येऊन कर भरत आहे. जनतेकडून जे काही घेतले, ते जनतेला अर्पण केले,' असंही मोदी यावेळी म्हणाले.