देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तलंगणामध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. यांपैकी राजस्थान, मध्येप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रचंड मोठा विजय झाला आहे. यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत", असेही शाह यांनी म्हटले आहे.
जनतेच्या मनात केवळ मोदी - "जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत. आजच्या निवडणूक निकालांनी हे सिद्ध केले आहे की, तुष्टीकरण आणि जातीवर राजकारणाचे दिवस आता संपले आहेत. आता नवा भारत हा पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर मदतान करतो. या प्रचंड पाठिंब्याबद्दल मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनतेला नमन करतो. भाजपच्या या भव्य विजयाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन," असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे.
सर्व मतदारांचे मनापासून आभार : पंतप्रधान मोदी -"जनतेला प्रणाम! मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर आहे, त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल, मी या सर्व राज्यातील मतदारांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना खात्री देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू."
तेलंगणातील जनतेचेही आभार मानले -आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जनतेचेही आभार मानले. 'तेलंगणातील माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी खूप आभार. गेल्या काही वर्षांमध्ये तुमचा आम्हाला पाठिंबा वाढतच चालला आहे आणि पुढील काळातही हा ट्रेंड कायम राहील. तेलंगणासोबतचे आमचे नाते अतूट आहे आणि आम्ही लोकांसाठी काम करत राहू. मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचेही कौतुक करतो.'