पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट आली आहे. या दहशतवाद्यांना आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मात्र दुसरीकडे पहलगाममधील हल्ल्यानंतर आता या मुद्यावरून राजकारणही सुरू झालं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय असलेल्या शक्ती सिंह यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून एक सनसनाटी आणि वादग्रस्त विधान केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधीस सभेमधून दहशतवाद्यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना शक्ती सिंह यांनी हे विधान केलं आहे. पहलगामधील घटनेमधून कटकारस्थानाचा संशय येत आहे. असं वाटतं की, पहलगामची स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती, असा दावा शक्ती सिंह यांनी केला. शक्ती सिंह यांच्या या विधानाविरोधात आता एनडीए आणि भाजपाच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
तर आरजेडीचे नेते अब्दुल बारी सिद्धिकी म्हणाले की, काश्मीरमध्ये जे काही घडलं आहे ते दु:खद आहे. सरकारच्या कमकुवतपणामुळे हे घडले आहे. सरकार अपयशी ठरलं आहे. आम्ही याक्षणी राजकारण करह नाही आहोत. मात्र सरकारने याबाबत विचार केला पाहिजे.
दरम्यान, आरजेडीचे नेते शक्ती यादव यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा प्रवक्ते अजय आलोक यांनी संतप्त प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले की, शक्ती यादव जे काही बोलतात, त्याला तेजस्वी यादव यांची फूस असते. त्यामुळे शक्ती यादव हे तेजस्वी यादव यांच्या मनातीलच बोल बोलत आहेत. यावरून तेजस्वी यादव आणि शक्ती यादव यांचे विचार कसे आहेत हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. पहलगाममधील हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोक व्यक्त करत असताना आरजेडीचे नेते अशी वादग्रस्त विधानं करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.