पटना : वर्षअखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. अशातच बिहारमधील विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत एक आश्वासन दिले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार स्थापन होईल, तर आम्ही जिंकलो तरी ईव्हीएम हटवले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
निवडणूक आयोग विरोधकांचे प्रश्न, शंका आणि तक्रारी सोडवण्यात अपयशी ठरला आहे. रेफरी आणि अंपायर तर सोडाच, निवडणूक आयोग आता प्रेक्षकही राहिलेला नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे चिअर्स-लीडर बनले आहेत, असे म्हणत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे
निवडणूक आयोग लोकशाही आणि संविधानासाठी कॅन्सर बनत चालला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी निवडणूक आयोगाने एकाच दिवसात तीन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. मतमोजणी पाच तास थांबवण्यात आली होती. रात्री २ वाजेपर्यंत निकाल जाहीर झाले होते. लोकांना ईव्हीएमबद्दल शंका आहे, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, तेजस्वी यादव यांनी माहिती शेअर करत बिहार सरकारला गुन्हेगारी नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचे घोषित केले आहे. जानेवारीमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत अशा घटनांची संख्या १३७ झाली असल्याचेही तेजस्वी यादव यांनी सांगितली आहे. तसेच,पोस्टवर रक्ताचे दोन थेंब दर्शविणारे चिन्ह देखील आहे.