रांची पोलिसांनी कांके पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ सप्टेंबर रोजी अवधेश कुमार याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती तपासातून समोर आणली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, अवधेश कुमार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा दुसरा तिसरा कुणी नसून जमिनीच्या व्यवहारात त्याचा पार्टनर असलेला चितरंजन होता. त्याने कोट्यवधींच्या जमिनीसाठी जे भायनक कारस्थान रचले त्याची कल्पनाही कुणी करू शकणार नाही.
मात्र आता या प्रकरणात चितरंजनची पत्नी आणि मुलगाही तुरुंगात आहे. कारण त्यांना या संपूर्ण कटाची कल्पना होती. त्यांच्यावर पुरावे लपवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रांची पोलिसांच्या मते अवधेशच्या हत्येचा कट बऱ्याच काळापासून रचला जात होता. जेव्हा सर्व काही प्लॅन झालं त्यानंतर चितरंजन स्वत: बिहारला गेला. तिथे गांधी मैदानात पोलिसांनी त्याला मद्यासह पकडले आणि त्याला तुरुंगात पाठवले. चितरंजन याला पोलिसांनी दारूच्या तीन बाटल्यांसह पकडले होते.
पोलिसांनी सांगितले की, त्याला जामीनसुद्धा मिळाला असता. मात्र त्याने जामीन घेण्याचा कुठला प्रयत्न केला नाही. या हत्येनंतर त्याला कायदेशीर फायदा मिळावा म्हणून त्याने हा डाव आखला होता. या प्रकरणात चितरंजन कुमारचा मुलगा हर्ष हा सुद्धा कुणालाही संशय येऊ नये म्हणून घटनेपूर्वी दिल्लीला गेला होता. पोलिसांच्या मते या प्रकरणातील दोन शूटर आणि कृष्ण हे अजूनही फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. यात आणखी काही आरोपींचा समावेश होऊ शकतो. कारण चितरंजनला पोलीस रांचीला आणतील तेव्हा या प्रकरणात आणखीही काही गौप्यस्फोट होऊ शकतात.