नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात देशातील 3.3 लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (PMKSK) मध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली. ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये बदलण्यात येतील. या केंद्रांवर एकाच छताखाली बियाणे, खते आणि मातीच्या चाचणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, या केंद्रांवर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गोष्टींची माहिती करून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर किमान एका किरकोळ दुकानाला मॉडेल शॉप म्हणून विकसित केले जाईल, अशी सरकारची योजना आहे. या अंतर्गत जवळपास 3,30,499 किरकोळ खतांची दुकाने पीएमकेएसकेमध्ये रूपांतरित केली जातील.
600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकऱ्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे, असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ही केंद्रे वन स्टॉप शॉप म्हणून विकसित केली जाणार आहेत. सध्या खताची दुकाने उत्पादक कंपन्यांच्या डीलर नेटवर्कद्वारे चालविली जातात, परंतु तेथे शेतीशी संबंधित प्रत्येक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारा माल घेण्यासाठी 2-3 वेगवेगळ्या दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
1 कोटीहून अधिक शेतकरी सामीलकिसान सन्मान संमेलनात 1 कोटीहून अधिक शेतकरी व्हर्च्युअल माध्यमातून सामील झाले. या कार्यक्रमादरम्यान शेतीशी संबंधित 1500 स्टार्टअप्स लाँच करण्यात आले. यासोबतच खताशी संबंधित 'इंडियन एज' नावाचे ई-मासिकही सुरू करण्यात आले.
पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जारीया किसान सन्मान संमेलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला. विशेष म्हणजे, केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी एकदा शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची आर्थिक मदत करते. यापूर्वी सरकारने 11 हप्ते जारी केले आहेत. यावेळी जवळापस 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानची रक्कम पाठवण्यात आली आहे.