पुणे : अचानक वीज गायब झाल्याने उमेदवारी अर्जासोबत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र तयार न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. तर त्याच वेळी काँग्रेसमधून आलेले दीपक मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी ही चलाखी करण्यात आल्याचीही राजकीय चर्चा रंगली आहे. पक्षाने काकडे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यांना ए-बी फॉर्मही देण्यात आला. अहमदनगरहून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते पुण्यात आले. एक वाजता ए-बी फॉर्मसह उमेदवारी अर्जही भरला. उमेदवाराला वैयक्तिक माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. अर्ज भरण्याच्या मुदतीत त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. वीज गेल्याने प्रतिज्ञापत्र तयार करण्यास उशीर झाला, असे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांचा रोष टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही चलाखी केल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
काकडेंची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता
By admin | Published: September 29, 2014 7:21 AM