नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी दुपारी स्वाक्षरी केल्याने राज्यात रविवारपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी रात्री तातडीने बोलावण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी दुपारी स्वाक्षरी केली आहे.
चव्हाण यांनी शुक्रवारी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्या काळजीवाहू सरकारकडे कार्यभार ठेवला होता. शनिवारी त्यांनी राजीनामा स्वीकृत करताच संध्याकाळी राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन चर्चा केली. अल्पमतातील सरकारकडून निवडणुकीत यंत्रणोचा गैरवापर होऊ शकतो, असा सूर व्यक्त होत असतानाच राज्यपाल राव यांनी शनिवारी चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारत राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्रीय मंत्रिमंडळाकडे केली
होती.
निवडणूक जाहीर झालेली असताना आणि विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यास जेमतेम एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.