पाटाम्दा (झारखंड): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हिताकडे डोळेझाक करीत काही मोजक्या उद्योगपतींच्या भल्यासाठी कोळसा क्षेत्रचे खासगीकरण करण्याचा डाव आखला असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला.
झारखंडमधील जनतेच्या भल्यासाठी काँग्रेसने कोळसा क्षेत्रच्या राष्ट्रीयीकरणाचे पाऊल उचलले होते. भाजपा सरकारने काही उद्योगपतींसाठी खासगीकरणाची योजना आखली आहे, असा दावा त्यांनी केला. जुगसलाई (राखीव) मतदारसंघातील दुलाल भुयान यांच्या प्रचारार्थ निवडणूक सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.
गुजरातमध्ये आदिवासी बनले विस्थापित..
गुजरातमध्ये आदिवासींची संख्या 8 टक्के असून भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या जमिनी बळकावण्यात आल्यामुळे त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी आली आहे. भाजपा जे बोलतो नेमके त्याच्या उलट करतो, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)