नवी दिल्ली - राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूरमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी मंदिरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सीकर परिसरातील या मंदिराच्या जत्रेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पाच वाजता मंदिर उघडण्यापूर्वीपासूनच परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. याच दरम्यान अनेक महिला भाविक खाली पडल्या. त्यांना उभं राहायलाच मिळालं नाही. यामध्ये तीन महिलांचा मृत्य झाला. त्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तर इतर जखमींवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.
चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या टीम या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कोरोनानंतर या प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेहमीच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.