नवी दिल्ली : ‘बॉम्बे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने सुरू केली असून, प्रजासत्ताक दिनापूर्वी हा बदल होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नऊ वर्षांपूर्वीच राज्य सरकारने ‘मुंबई हायकोर्ट’ करण्यासाठी ना हरकत केंद्राला कळविली आहे.केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने नामांतर करण्याबाबत भारतीय संविधानातील परिशिष्ट सात मधील सूची-१ खालील नोंद क्रमांक ७८ तसेच अनुच्छेद २४६(१)अंतर्गत स्वतंत्र अधिनियम प्रस्तावित केले असून, २७ आॅगस्ट २०१२ पासून सुरू असलेल्या ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती या विभागातील सूत्राने दिली. उच्च न्यायालयाच्या बाबतीत बॉम्बेचे नामांतर मुंबई असे करण्यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे पडून आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने दिलेला अहवाल व राज्यातील अन्य खंडपीठातील न्यायाधीशांच्या बैठकींचे कार्यवृत्त या अहवालासोबत जोडलेले आहे. त्यानंतर राज्य सरकाने १० पत्रे केंद्राला नामांतर करण्याबाबत दिली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा केंद्र सरकारला पत्रे दिली, मात्र अजूनही निर्णय रखडला आहे. आॅगस्ट महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शिवसेना खा. विनायक राऊत यांनी बुधवारी शून्य प्रहरात हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. (विशेष प्रतिनिधी)
२६ जानेवारीपूर्वी हायकोर्टाचे नामांतर
By admin | Published: December 04, 2014 3:05 AM