नवी दिल्ली : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारने आपली मोहीम तीव्र केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना परत आणण्याच्या सूचना हवाई दलाला दिल्या आहेत. आज मंगळवारपासून हवाई दलाची अनेक सी-17 विमानेही सज्ज करण्यात येणार आहेत. ही विमाने भारतातून युक्रेनपर्यंत मदत सामग्री घेऊन जातील. आतापर्यंत 2016 भारतीय युक्रेनमधून परतले आहेत. आजही अनेक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत.
दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज सहावा दिवस आहे. 24 फेब्रुवारीपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. युक्रेनमधील परिस्थिती अजूनही वाईट आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये चर्चाही सुरू झाली आहे. सोमवारी बेलारूसच्या सीमेवर रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. मात्र, चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू करण्यात आली. केंद्र सरकारने 26 फेब्रुवारीला ऑपरेशन गंगाची सुरुवात केली. मंगळवारी सकाळी एअर इंडियाची सातवी फ्लाइट 182 भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्ट, रोमानिया येथून मुंबईला पोहोचली एअर इंडियाची फ्लाइट IX1202 मुंबई विमानतळावर पोहोचली, त्यावेळी या भारतीय नागरिकांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले.
दरम्यान, काल बुडापेस्टहून सहावी फ्लाइट 240 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला पोहोचली, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. त्यांनी ट्विट केले की, बुडापेस्टहून सहाव्या ऑपरेशन गंगा फ्लाइटने 240 भारतीय नागरिकांना दिल्लीला आणले. तसेच, अजून युक्रेमधून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत.
चार केंद्रीय मंत्र्यांकडे जबाबदारी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू, व्हीके सिंग आणि हरदीप सिंग पुरी यांना युक्रेमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला, किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि व्हीके सिंग पोलंडला जाणार आहेत.