आपकडून दिल्लीत धर्मनिरपेक्ष, तर गुजरातेत हिंदुत्ववादी अजेंडा; भाजपनेही सुरू केले नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 12:00 PM2022-11-04T12:00:45+5:302022-11-04T12:01:19+5:30

पंतप्रधान मोदी यांचे खास लक्ष

Secular agenda from AAP in Delhi, Hindutva agenda in Gujarat; BJP also started planning | आपकडून दिल्लीत धर्मनिरपेक्ष, तर गुजरातेत हिंदुत्ववादी अजेंडा; भाजपनेही सुरू केले नियोजन

आपकडून दिल्लीत धर्मनिरपेक्ष, तर गुजरातेत हिंदुत्ववादी अजेंडा; भाजपनेही सुरू केले नियोजन

googlenewsNext

- शरद गुप्ता 

नवी दिल्ली : एकेकाळी गोल जाळीदार टोपी घालून इफ्तार आयोजित करणारे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आता चलनी नोटांवर लक्ष्मी, गणेशाची चित्रे लावण्यासह वृद्धांना श्रीराम जन्मभूमी मंदिराचे दर्शन करण्याचा वायदा करीत आहेत. गुजरातेत विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा निश्चित केला आहे. 

काँग्रेसची व्होट बँक न फोडता गुजरातेत ते हिंदू व्होट बँकेवर कब्जा करू इच्छित आहेत. या राज्यात ८८.५७ टक्के हिंदू लोकसंख्या आहे व मुस्लिमांची संख्या ९.६७ टक्के आहे. गुजरातेत २७ वर्षांपासून राज्य असलेला भाजप अँटी इन्कम्बन्सीचा सामना करीत आहे. 
त्यांच्या या रणनीतीचे समर्थन करताना आपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, अल्पसंख्याकांची शंभर टक्के मते घेण्यापेक्षा बहुसंख्याकांची १५ ते २० टक्के मते घेणे चांगले आहे.

आप काय करतेय?

आपचा आक्रमक प्रचार व निवडणूकपूर्व आकर्षक आश्वासनांमुळे उत्सुकता वाढली आहे. केजरीवाल यांनी दरमहा ३०० युनिट मोफत वीज, सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण, बेरोजगारी दूर करणे, महिलांना १ हजार रुपये भत्ता आणि नवीन वकिलांना मासिक मानधन अशा अनेक सवलती देण्याचे जाहीर केले आहे. 

भाजपची रणनीती काय?

भाजपही हिंदुत्वाच्या अजेंड्याला जोरदारपणे पुढे नेणार आहे. संपूर्ण गुजरातमध्ये केजरीवाल यांचे गोल जाळीदार टोपी घातलेले पोस्टर संपूर्ण गुजरातेत लावले आहेत. हिंदू धर्माला पागलपण मानतो, असे ते म्हणताना दाखवले आहे. या पोस्टरवर हिंदू हित रक्षक समितीने लिहिले आहे की, हे आहेत आम आदमी पार्टीचे शब्द आणि संस्कार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्राथमिकता निश्चित केली आहे. एका आठवड्यानंतर होणाऱ्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आतापर्यंत एक दौरा केलेला आहे. मागील महिन्यात त्यांनी गुजरातचे तीन दौरे केलेले आहेत व प्रत्येक वेळी राज्यात २ ते ३ दिवस वास्तव्य केलेले आहे, तसेच जनतेला संबोधित केलेले आहे. त्यांनी आपला शहरी नक्षल म्हटलेले असून, सावध राहण्याचे आवाहनही केलेले आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या गुपचूप पद्धतीने चाललेल्या प्रचाराचा मुकाबला करण्यासही सांगितलेले आहे. यामुळे काँग्रेसचे मतदार निष्क्रियतेमुळे आपकडे जाऊ नयेत, यावरही लक्ष ठेवण्यास सांगितलेले आहे.

काँग्रेसच्या आघाडीवर अद्याप सामसूम

भाजप व आप जोमात असताना काँग्रेसच्या निवडणूक आघाडीवर अद्यापही कमालीची सामसूम आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी ७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत व्यग्र असून, ही यात्रा जवळपास पाच महिने चालणार आहे. ते गुजरातेत पक्षाचा प्रचार करणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

समुद्रातही मतदान

राज्याला मोठा समुद्रकिनारा आहे. काही मतदार समुद्रात राहतात. त्यांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी शिपिंग कंटेनरमध्ये मतदानाची व्यवस्था केली जाणार असून, असे २१७ मतदार आहेत. 

निवडणुकीची घोषणा उशिरा का ? : काँग्रेस

मतमोजणी एकाच दिवशी होणार असतानाही हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका स्वतंत्र तारखांना का जाहीर केल्या याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने देशातील जनतेला द्यावे, असे काँग्रेसने गुरुवारी म्हटले.  

सोशल मीडियावर आयोगाची चर्चा

निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करून झाल्यानंतर आयोग गुजरातमध्ये निवडणुकीची घोषणा करत आहे, अशी टीका विरोधकांकडून अनेकांनी केली. आयोग भाजपच्या हातातील बाहुली असल्याचेही काहींनी म्हटले. त्यावर, ‘आयोग पर निशाना, राहुल को हैं बचाना’ असे ट्विट भाजपच्या काही नेत्यांनी, समर्थकांनी केले. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये ‘आप’चा किती प्रभाव पडणार? याबाबत आणि ‘आप’मुळे गुजरातमध्ये त्रिशंकू चित्र दिसणार की नाही? याबाबतही अनेकजण ट्विट करत होते.

Web Title: Secular agenda from AAP in Delhi, Hindutva agenda in Gujarat; BJP also started planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.