Shashi Tharoor S Jaishankar: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारावर चिंता व्यक्त केली. तसेच, पाकिस्तानला फटकारणाऱ्या परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या वक्तव्याचे समर्थनही केले. थरूर म्हणाले, प्रत्येकजण पाकिस्तानातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. जयशंकर यांचे वक्तव्य पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची आपल्याला काळजी असल्याचे द्योतक आहे. यात एक अडचण अशी आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणतीही खरी चर्चा सुरू नाही. अन्यथा आम्ही थेट आमच्या समस्या मांडून योग्य कारवाईची मागणी करू शकलो असतो.
शशी थरुर पुढे म्हणाले, परराष्ट्र मंत्र्याचे विधान पूर्णपणे तथ्यात्मक होते. पाकिस्तानात अतिशय विदारक परिस्थिती आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. संसदेत जयशंकर यांच्या विधानानंतर थरुर यांची टिप्पणी आली, ज्यात ते म्हणाले - पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे.
यावेळी जयशंकर यांनी सभागृहात सांगितले की, पाकिस्तानमध्ये शीख समुदायाशी संबंधित तीन घटना घडल्या. एका प्रकरणात शीख कुटुंबावर हल्ला झाला होता. दुसऱ्या घटनेत शीख कुटुंबाला जुना गुरुद्वारा पुन्हा उघडण्यासाठी धमकावण्यात आले. तर, शीख समुदायातील मुलीचे अपहरण करून धर्मांतराचे प्रकरणही समोर आले आहे. यासोबतच अहमदिया समुदायाशी संबंधित दोन प्रकरणे समोर आली होती. एका प्रकरणात, त्यांची मशीद सील करण्यात आली, तर दुसऱ्या प्रकरणात 40 कबरींची तोडफोड करण्यात आली. याशिवाय, ख्रिश्चन समुदायाशी संबंधित एक प्रकरण आहे. कथितरित्या मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका ख्रिश्चन व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता.
ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तानच्या अहवालात काय?तीन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ह्युमन राइट्स फोकस पाकिस्तान (HRFP) च्या अहवालात 2025 च्या पहिल्या तिमाहीत पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या संख्येत तीव्र वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. एचआरएफपीचे प्रमुख नावेद वॉल्टर म्हणाले, पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवर हल्ले वाढले आहेत, त्यांना मारले जात आहे. त्यांना ईशनिंदेच्या आरोपात गोवले जात आहे. याशिवाय अपहरण, बळजबरीने धर्मांतर, बळजबरीने विवाह करण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुस्लिमेतरांचे दुःख समजून घेणारे कोणीच नाही. त्यांच्या दुर्लक्षाकडे लक्ष न देणे हे अधिक क्लेशदायक आहे.