वीज बिलांची थकबाकी थांबविण्यासाठी देशभरात स्मार्ट वीज मीटर लावण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच दृष्टीने वीज वितरण कंपन्यांना हे स्मार्ट मीटर सोईचे असले तरी ग्राहक मात्र यात भरडून जाऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले असून त्यांच्या समस्या सुटत नसल्याने ते आता वीज वितरण कंपन्यांचे उंबरे झिजवू लागले आहेत.
काही ठिकाणी बिल वापरापेक्षा जास्त येत आहे, तर काही ठिकाणी विद्युत भार जास्त दिसत आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्राहक या टेबलवरून त्या टेबलवर जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडून यावर काही काम होत नसल्याने ते देखील या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे जा असे सांगू लागले आहेत.
कौशांबी जिल्ह्यात १ लाख ८१ हजार २४४ घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. मीटर बसवण्याची जबाबदारी जेएमआर कंपनीला देण्यात आली आहे. शहरी भागात स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. आतापर्यंत २७ हजार १०९ घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या नव्या मीटरने ग्राहकांच्या अडचणी वाढविल्या आहेत. फूलचंद केसरवानी या ग्राहकाने सांगितले की, आतापर्यंत दोनदा चुकीचे वीज बिल आले आहे. वीज मंडळाकडे गेल्यावर कधी या कार्यालयात जा, कधी त्या कार्यालयात जा म्हणून सांगितले जात आहे.
संदर लाल प्रजापती नावाच्या हॉटेल व्यावसायिकाने सांगितले की, वीज बिलात समस्या आहेत. आता थंडीचा मोसम होता, उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात विजेचा जास्त वापर होतो. थंडीच्या मोसमातच अव्वाच्या सव्वा बिल आले तर उन्हाळ्यात या चुका तशाच राहिल्या तर किती बिल येईल असा सवाल त्यांनी केला आहे. हे बिल भरणे कठीण होणार असल्याचे ते म्हणाले.