पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे भाजप पंजाबमधील चन्नी सरकारवर हल्ले चढवत आहे, तर दुसरीकडे सीएम चन्नी सुरक्षेत चूक झालीच नसल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्याशी संपर्क साधला. यात त्यांनी, या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेस हायकमांडने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आहे. यावेळी सोनिया गांधी यांनी सीएम चन्नींना, पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. तसेच झालेल्या घटनेस जे कुणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही म्हटले आहे.
यावेळी सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. चन्नी यांनीही सोनिया गांधींना घटनेची संपूर्ण माहिती दिली आणि आपण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले.
एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शेवटच्या क्षणी अचानक बदल झाला. पंतप्रधानांना हेलिकॉप्टरने जायचे होते. मात्र त्यांनी अचानकच रस्त्याने जाण्याचे ठरवले. यात पोलिसांची चुकी नाही. तसेच, आंदोलक ज्या ठिकाणी रस्ता रोखून बसले होते, तेथपासून पंतप्रधानांचा ताफा एक किलोमीटर आधीच थांबवण्यात आला होता. मग यात धोका कसला?
मुख्यमंत्री चन्नींकडून पंजाब पोलिसांचा बचाव - मुख्यमंत्री चन्नी पंजाब पोलिसांचा बचाव करताना म्हणाले, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी, हे केंद्रीय संस्था इंटेलिजन्स ब्युरो आणि एसपीजीचे अपयश आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी आयबीच्या संचालकांनीही सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. परंतु अचानक सकाळी 10-12 जण जवळच्या गावातून आले आणि रस्त्यात बसले होते. याशिवाय पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी येणार होते, तो भाग मुळातच बीएसएफच्या अखत्यारीत येते, यामुळे यात राज्य पोलिसांची कसलीही चूक नाही.