ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - मध्यप्रदेशमध्ये एकाच दिवसी दोन रेल्वे गाड्यांना अपघात झाला असून या अपघातांची जबाबादारी स्वीकारत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
मध्यप्रदेशमधील हरदा येथे दोन रेल्वे गाड्यांचे डबे घसरुन २५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे सुरेश प्रभूंवर टीका केली आहे. सुरेश प्रभू तुम्ही एक चांगले मंत्री आहात असे मला नेहमीच वाटते, पण सध्या रेल्वेत काय चालू आहे, एकाच दिवशी दोन गाड्यांना अपघात होतो, त्यापूर्वी इटारसीतील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे रेल्वेचा बोजवारा उडाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघातानंतर राजीनामा दिला होता अशी आठवण करुन देत सिंह यांनी प्रभूंनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.