राहुल गांधींना सरकार घाबरते, प्रियांका गांधींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 06:23 IST2025-01-22T06:23:26+5:302025-01-22T06:23:48+5:30
Priyanka Gandhi News: काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले.

राहुल गांधींना सरकार घाबरते, प्रियांका गांधींचा हल्लाबोल
- प्रकाश बेळगोजी
बेळगाव (कर्नाटक) - काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले.
येथे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ सभेत बोलताना खा. प्रियांका यांनी दावा केला की, संविधानासाठी लढत असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्र सरकार घाबरते.
अनेक सरकारे आली-गेली, अनेक पक्ष आले पण...
अनेक सरकारे आली आणि गेली, अनेक पक्ष सत्तेत आले, परंतु ज्यांचे गृहमंत्री संसदेत डॉ. बाबासाहेबांचा अवमान करतात असे सरकार कधी आले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली.
रा. स्व. संघाच्या विचारांनी संविधानाच्या निर्मितीवेळीही अपमान करून संविधानाविरुद्ध अभियान चालवले होते, असेही खा. प्रियांका गांधी म्हणाल्या.
‘खा. राहुल गांधी असोत, मी असो किंवा खरगे असोत, यापैकी कुणीही घाबरणारे नाहीत. कारण, आमचे विचार सत्याचे आहेत’, असेही त्यांनी नमूद केले.