नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगर येथील इक्बाल अहमदने यूपीएससीमध्ये ९९८ वा क्रमांक मिळवला आहे. इक्बालचे वडील मकबूल अहमद हे नंदौर येथे सायकल पंक्चरचे दुकान चालवायचे. इक्बाल हा पाच भावंडांपैकी एक आहे. ज्यामध्ये तीन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्याचा दुसरा भाऊ रंगकाम करतो.
सिरसा येथील जोगेंद्र सिहागने ५२१ वा क्रमांक मिळवला आहे. आपल्या यशाबद्दल जोगेंद्र म्हणाले की, त्याने आजोबा आणि धाकट्या भावाची स्वप्ने पूर्ण केली. जोगेंद्रचे वडील सुरेंद्र चौधरी हे शेतकरी आहेत आणि आई मैना देवी गृहिणी आहेत. गेल्या वर्षीच्या यूपीएससी परीक्षेदरम्यान धाकटा भाऊ मुकेशचा मृत्यू झाला. प्राथमिक परीक्षेदरम्यान आजोबा जगदीश सिहाग यांचाही मृत्यू झाला. गावातीलच सरकारी आणि खासगी शाळांमध्ये दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर बीएच्या अभ्यासासोबतच त्याने यूपीएससीची तयारी केली.
भाऊ आणि आजोबांचे निधन झाले, पण तो खचला नाहीआयएएस हेमंत पारिक म्हणाले की, आम्ही दोघांनीही आयएएस होण्याचा निर्णय घेतला. यानंतर, दोघांनी जयपूरमध्ये एकत्र यूपीएससीची तयारी केली. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही दिल्लीला आले. मी गेल्या वर्षीच यूपीएससीचा पेपर उत्तीर्ण झालो होतो. भाऊ आणि आजोबांच्या निधन झाले असतानही तो सतत तयारी करत राहिला. त्यामुळेच त्याला हे यश मिळाले आहे.
वडिलांच्या निधनानंतरही मानली नाही हार
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची आयुषी बन्सल हिने सातवा क्रमांक मिळवला आहे. तिचे वडील भारतीय जीवन विमा महामंडळात काम करत होते. पण अचानक आयुषीच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या जागी त्यांच्या आईला अनुकंपा नियुक्ती मिळाली. वडिलांच्या निधनानंतर घर चालवण्याची जबाबदारी आईवर आली. आयुषीला शिक्षित करण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी तिने जगाशी लढा दिला. म्हणूनच आयुषी तिच्या यशाचे सर्व श्रेय तिची आई राधा बन्सल यांना देत आहे. आयुषीने आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले, दोन नामांकित कंपन्यांमध्ये काम केले. नंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. यापूर्वी २०२२ मध्ये तिची यूपीएससीमधून निवड झाली होती. तिने भारतात १८८ वा क्रमांक मिळवला होता
शेतकऱ्याच्या मुलीचे यश; घरात ४ मुली, पण...
फतेहाबादमधील तोहानाच्या थरवा गावातील शेतकऱ्याची मुलगी विजयालक्ष्मीने २३३ वा क्रमांक मिळवला आहे. शेतकरी प्रेम कुमार यांची मोठी मुलगी विजयालक्ष्मी गेल्या अनेक वर्षांपासून चंडीगडमध्ये राहत असताना शिक्षण घेत होती. त्यांच्या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा आहे. विजयालक्ष्मीच्या या कामगिरीमुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिची आई प्रोमिला आणि आजी मोहिनी म्हणते की, तिने कधीही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला नाही आणि सर्वांना समान शिक्षण दिले.
मिठाईचे दुकान, मात्र...
मध्य प्रदेशमधील वीरेंद्र कुमार अग्रवाल यांचा मुलगा चंद्रकुमार अग्रवाल याची आयएफएसमध्ये निवड झाली आहे. त्याने देशात ३५ वा क्रमांक मिळवला आहे. चंद्रकुमारच्या वडिलांचे बडा बाजारात मिठाईचे दुकान आहे, पण त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्याने ते ध्येय साध्य केले.
अंगणवाडी सेविकेच्या मुलाने उंचावली मानहिमाचलमधील किन्नौर जिल्ह्यातील २३ वर्षीय प्रथम यंबूरने दुसऱ्या प्रयत्नात ८४१ वा क्रमांक मिळवला आहे. प्रथमचे वडील बागकाम करतात, तर आई अंगणवाडी सेविका आहे.