नवी दिल्ली : ‘आप की अदालत विथ रजत शर्मा’ या टीव्ही शो ने दूरचित्रवाणीच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला शो म्हणून इतिहास घडविला. २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकारणी, क्रीडा, व्यावसायिक, आध्यात्मिक गुरूंनी एकत्र येत या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची प्रचिती दिली.प्रगती मैदानावर हजेरी लावणाऱ्या मान्यवरांमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, स्मृती इराणी, वेंकय्या नायडू, सुरेश प्रभू, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रामविलास पासवान, धर्मेंद्र प्रधान, राज्यवर्धन राठोड, नजमा हेपतुल्ला, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पी.ए. संगमा, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे शिंदे, हरीश रावत आदींचा निमंत्रितांमध्ये समावेश होता. शाहरुख, सलमान आणि आमीर खान यांच्यासह अनिल कपूर, अजय देवगण, हेमामालिनी, अनुपम खेर, सोनाक्षी, शत्रुघ्न सिन्हा, राणी मुखर्जी, क्रिकेटपटू गौतम गंभीर, बाबा रामदेव, स्वामी अग्निवेश, मौलाना मदानी यांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता.अनिल अंबानी, गौतम अदानी, हरी भरतिया, राजकुमार धूत हे उद्योगपतीही कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली, हिमेश रेशमिया, उदित नारायण, अनू मलिक, जाहिरात गुरू व गीतकार प्रसून जोशी, राखी सावंत, डॉ. नरेश त्रेहान, दलेर मेहंदी, साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, राजू श्रीवास्तव, साक्षी सिन्हा आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण बेदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ, सचिन पायलट, जनार्दन द्विवेदी, सलमान खुर्शीद, जगदीश टायटलर, विजय बहुगुणा, रिता बहुगुणा, रेणुका चौधरी, सुशीलकुमार शिंदे, आर.के. धवन, डॉ. करणसिंग, संजदचे अध्यक्ष शरद यादव, रालोदचे अध्यक्ष अजितसिंग, अमरसिंग, जया बच्चन यांनीही हजेरी लावली होती.या शो च्या खास हायलाईटस्मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आप की अदालत’ मधील हजेरीच्या खास आठवणी आणि अनुभवांचा समावेश होता. तीन खानांनी रजत शर्मा यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत प्रश्न विचारून भंडावून सोडल्याचा प्रसंगही लक्षवेधी ठरला.आप की अदालत हा कार्यक्रम वेगळा का आहे? याचे कारण देताना मोदी म्हणाले, या कार्यक्रमाच्या २१ वर्षांच्या इतिहासात कुणाल्याही उत्तरासाठी बळजबरी करण्यात आली नाही. आपल्या गोड खुबीने उत्तर मिळविण्याची कला रजत यांना ज्ञात आहे. रजत फार कमी बोलतात पण अगदी क्षुल्लक बाबीतही ते आपले मन झोकतात. त्यामागे त्यांचे हुशार डोके आहे. इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि एडिटर- इन- चीफ असलेले रजत शर्मा म्हणाले की, मी अगदी भारावून गेलो असून माझे शब्द अपुरे पडतात. गेली दोन दशके मी केवळ माझे काम चोख करण्यावरच भर देत होतो. मी कधीही एवढे प्रेम आणि आदराची अपेक्षा केली नाही. देशभरातील आयकॉन्सनी मला भरभरून प्रेम दिले. सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो. मी माझा आवाज मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला भरघोस समर्थन दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तीन खानांनी रजत शर्मांना उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात
By admin | Published: December 05, 2014 1:56 AM