'वाघ कुत्र्यांची शिकार करत नाही'; माजी मुख्यमंत्री रावत यांचं विधान, IAS असोसिएशन भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:18 IST2025-03-31T11:17:43+5:302025-03-31T11:18:56+5:30
Trivendra Singh Rawat News: माजी मुख्यमंत्री आणि खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे.

'वाघ कुत्र्यांची शिकार करत नाही'; माजी मुख्यमंत्री रावत यांचं विधान, IAS असोसिएशन भडकली
Trivendra Singh Rawat: उत्तराखंडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारत्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विधानाने वाद वाढला आहे. उत्तराखंडचे खाण उत्खनन विभागाचे सचिव ब्रजेश संत यांच्यावर अप्रत्यक्षपणे बोलताना रावत यांनी वाघ कुत्र्यांची शिकार करत नाही, असे विधान केले. त्यांचे हे विधान जातीवाचक असल्याचे सांगत आयएएस असोसिएशनने संताप व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विधानाचे पडसाद उत्तराखंडमधील प्रशासनात उमटले आहेत. रावत यांच्या विधानाचा प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जात आहे.
हेही वाचा >>"काय आनंदाची गुढी उभारायची, मी त्यात पडत नाही"; वडेट्टीवारांचे वादग्रस्त विधान
प्रकरण काय?
खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शुक्रवारी (२८ मार्च) संसदेमध्ये असा दावा केला होता की, उत्तराखंडमध्ये अवैधपणे मोठ्या प्रमाणात खाण उत्खनन होत आहे.
त्यानंतर राज्याचे खाण उत्खनन विभागाचे सचिव ब्रजेश संत यांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले. दिशाभूल करणारी माहिती असल्याचे ते म्हणाले.
याबद्दल जेव्हा त्रिवेंद्र सिंह रावत यांना दिल्ली माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. तेव्हा रावत म्हणाले, "वाघ कुत्र्यांची शिकार करत नाही."
रावत यांच्या विधानावर संताप
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विधानाचे पडसाद प्रशासकीय वर्तुळात उमटले. हरिद्वारमध्ये त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांचा दावा फेटाळून लावला. पारदर्शी धोरणामुळेच राज्यातील खाण उत्खनन महसूल तीन पटीने वाढले आहे, असे ते म्हणाले.
आयएएस असोसिएशनकडून संताप
रावत यांच्या विधानानंतर ३० मार्च रोजी उत्तराखंडच्या आयएएस असोसिएशनने तातडीची बैठक घेतली. आनंद वर्धन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या बैठकीत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला की, आयएएस अधिकाऱ्यालाही सन्मान आणि प्रतिष्ठेचा आहे.
अधिकाऱ्यांच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल आणि त्यांच्या कामावर परिणाम होईल, अशी विधान राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्ष, संघटनांनी करू नये, असेही आयएएस असोसिएशनने म्हटले आहे.