ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ५ - मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील माचक नदीवरील पुलावर मुंबई - वाराणसी कामयानी एक्सप्रेस व जनता एक्सप्रेस या दोन गाड्यांचे १६ डबे रुळावरुन घसरल्याने २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे असून अपघातात १०० प्रवासी जखमी झाले आहेत तर ३०० प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात यश आले आहे.
मुंबईहून वाराणसीला जाणारी कामयानी एक्सप्रेस रात्री साडे अकरा वाजता मध्यप्रदेशमधील खिरकिया या स्थानकावरुन रवाना झाली. २० मिनीटांनी या गाडीने हरदा येथे पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र या दोन स्थानकादरम्यान माचक नदी असून या नदीवरील पुलावरुन जात असताना कामयानी एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरुन घसरले. या अपघाताच्या अवघ्या काही क्षणांनंतर याच पुलावर बिहारमधील राजेंद्रनगरहून मुंबईकडे येणारी जनता एक्सप्रेसही आली व या गाडीचेही पाच डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात २४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १०० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी बचावकार्य आता जवळपास संपुष्टात आले असून लवकरच या मार्गावरील सेवा पूर्ववत होईल असे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे माचक नदीचे पाणी पुलावर आले होते व यामुळे रुळाखालील खडी वाहून गेली होती. यामुळेच डबे घसरुन हा विचित्र अपघात घडला असा अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातातील मृतांना रेल्वेतर्फे दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामुळे या मार्गावरील सुमारे ३५ गाड्यांच्या वाहतुकीला फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.