ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - दिल्ली विधानसभा निवडणून अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना भारतीय जनता पक्षाने त्यांचे 'व्हिजन डॉक्युमेंट' सादर करत महिला सुरक्षा, वीज व पाणी प्रश्न सोडवण्यास आपले प्राधान्य असेल, असे आश्वासन दिल्लीवासियांना दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय, भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी आणि डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते.
दिल्लीला वर्ल्डक्लास शहर बनवू असे आश्वासन यावेळी भाजपाने दिले. गरिबांना पक्की घरे, तरूणांचा विकास, महिला सुरक्षा, स्वस्त वीज, प्रत्येक घरात २४ तास पाणी , कामकाजात पारदर्शकता आणि डिजीटलायजेशन या मुद्यांना प्राधान्य दिले जाईल असेही यावेळी बाजपातर्फे सांगण्यात आले. आपले सरकार सत्तेत आल्यास दर महिन्याला आपण व आपले मंत्री रेडिओवरील 'दिल की बात'च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ तसेच नवनव्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवू, असे किरण बेदी यांनी सांगितले.