लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेमध्येही हे विधेयक सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं. राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानावेळी या विधेयकाच्या बाजूने १२८ मतं पडली. तर ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल. त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर आहे.
दरम्यान, वक्फ विधेयकावर राज्यसभेमध्ये चर्चा पूर्ण झाल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड एक घटनात्मक संस्था आहे. तसेच ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे. या विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होणार नाही. उलट कोट्यवधी मुस्लिमांचा फायदाच होईल.
रिजिजू पुढे म्हणाले की, मुस्लिमांच्या धार्मिक कार्यांमध्ये बिगर मुस्लिम कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाहीत. तुम्ही म्हणताय की वक्फ बोर्डामध्ये केवळ मुस्लिम असले पाहिजेत. मग हिंदू किंवा इतर कुठल्या धर्माच्या लोकांसोबत काही वाद झाला, तर त्याचा निवाडा कसा काय होणार? त्यामुळे अशा प्रकारची संस्था ही सेक्युलर असली पाहिजे. यामध्ये असलेले चार लोक निर्णय कसा काय बदलू शकतात. ते केवळ आपल्या अनुभवाचा उपयोग करू शकतात. तसेच एकदा वक्फ घोषित झाल्यावर त्याचा स्टेटस बदलत नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
दरम्यान, राज्यसभेत पारित होण्यापूर्वी बुधवारी रात्री वक्फ संशोधन विधेयक हे लोकसभेमध्येही पारित झालं होतं. लोकसभेमध्ये वक्फ विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मतं पडली होती.