ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - बिहारचं गणित आम्हाला कळलं नसल्यामुळे भाजपाचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याची कबुली ज्येष्ठ नेते अरूम जेटली यांनी दिली आहे. पक्षविरोधी वक्तव्ये करणा-या नेत्यांवर कुठलीही कारवाई करण्यासंदर्भात निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवतांच्या आरक्षण विषयक वक्तव्याचा दाखला देताना, एखाद्या वाक्यामुळे असा पराभव होत नसतो असं सांगत जेटली यांनी पराभवामागचे ते एक मुख्य कारण मानण्यास नकार दिला.
भारतीय जनता पार्टी पराभवामागच्या विविध कारणांचा शोध घेईल आणि उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल असेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये सशक्त विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडू असे सांगतानाच बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर या पराभवाचा विपरीत परिणाम होणार नाही याची ग्वाहीही जेटलींनी दिली.