नवी दिल्ली : वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने बोर्डासोबत सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आज भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नाराज असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पाहुण्या संघाच्या बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, ‘वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने (डब्ल्यूआयसीबी) खेळाडूंसोबत सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर भारताचा सुरू असलेला दौरा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयला कळविला आहे. आम्ही डब्ल्यूआयसीबीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा आणि नुकसानभरपाईचा दावा करण्याबाबत विचार करीत आहोत. आम्ही हे प्रकरण सहज घेणार नाही; कारण आम्ही त्यांना प्रत्येक बाबतीत सहकार्य केले आहे, असे बीसीसीआयने सांगितले.
सुरूवातीला वेस्ट इंडिज बोर्डाने या वृत्ताचा इन्कार केला होता. मात्र बीसीसीआयने हा दौरा संपल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केले.