Cabinet Committee on Security, Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक सुमारे अडीच तासानंतर संपली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था, प्रति-कारवाई आणि भविष्यातील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तब्बल अडीच तास चालली बैठक
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची (CCS) बैठक बोलावली होती. दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक अडीच तासांहून अधिक काळ चालली. या बैठकीत भारतातील सुरक्षा परिस्थितीवर, विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सखोल चर्चा झाली.
सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे काय?
कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) - Cabinet Committee on Security ही देशातील सर्वोच्च सुरक्षा समिती आहे. संविधानात याचा उल्लेख नाही. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि सीमा सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर CCS समिती धोरणात्मक निर्णय घेते. पंतप्रधान या समितीचे अध्यक्ष आहेत; तर संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.