काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला सभागृहात बोलू दिलं जात नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. लोकसभेत बोलण्यासाठी त्यांना जो वेळ देण्यात आला होता. तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते, असा टोला शाह यांनी लगावला. तसेच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने मुस्लिमांसाठी केलेल्या ४ टक्के आरक्षणाच्या घोषणेचा उल्लेख शाह यांनी लॉलीपॉप असा केला आहे.
राहुल गांधी यांनी संसदेच्या कार्यपद्धतीवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले की, सभागृहात बोलण्याचे काही नियम असतात हे लोकसभेमधील विरोधी पक्षनेत्यांना कदाचित माहिती नसावे. सभागृह मनमानी पद्धतीने चालवता येत नाही. त्यांना अर्थसंकल्पावर चर्चेसाठी ४२ टक्के वेळ देण्यात आली होती. आता कुणी बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जेव्हा संसदेत गंभीर विषयांवर चर्चा सुरू होती, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. तसेच जेव्हा ते माघारी परतले, तेव्हा त्यांनी आपल्या इच्छेनुसार बोलण्याचा हट्ट सुरू केला. संसदेचं कामकाज हे नियम आणि प्रक्रियांनुसार चालतं. एका कुटुंबाकडून चालवण्यात येणाऱ्या काँग्रेस पक्षाप्रमाणे चालत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मार्च एंडिंगपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मोठा निर्णय घेतला; २.०९ लाख कोटी रुपयांची डील झाली
दरम्यान, धर्माधारित आरक्षणावरही अमित शाह यांनी टीका केली. ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर कुठलंही आरक्षण हे घटनेचं उल्लंघन आहे. तसेच असं आरक्षण न्यायालयांमधून रद्द करण्यात येईल. आम्ही धर्मावर आधारित कुठल्याही आरक्षणाच्या सक्त विरोधात आहोत.