PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचले. येथे त्यांनी पहिल्यांदा हिंदीत भाषण केले. पण त्यानंतर जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेतही थोडेसे भाषण केले. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला. त्यांच्या भाषणातून त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, लवकरच दहशतवाद्यांवर मोठी कारवाई होईल. बिहारच्या जनतेसमोर बोलताना पंतप्रधान मोदी इंग्रजीत का बोलले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामागे एक खास कारण असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय जाणकारांचे मत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीतून बोलताना म्हणाले-
"Today, From the soil of Bihar, I say to the whole world that India will identify and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Terrorism will not go unpunished. Every effort will be made to ensure justice is done. The entire nation stands firm in this resolve. Everyone who believes in humanity is with us. I thank the people of various countries and leaders who stood with us."
याचा अर्थ...
"बिहारच्या मातीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढेल आणि कडक शासन करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयांचा आत्मा कधीही खचणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या निर्धारावर ठाम आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. या कठीण काळात आपल्यासोबत उभ्या राहिलेल्या विविध देशांतील जनतेचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो."
पंतप्रधान मोदी इंग्रजीतून का बोलले?
पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये इंग्रजीत भाषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे कारणही बऱ्याच प्रमाणात स्पष्ट आहे. भारत आता जगाला दहशतवादाबद्दल स्पष्ट संदेश देत आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण हे एक संकेत म्हणून पाहिले जात आहे की भारत यापुढे असे हल्ले खपवून घेणार नाही. त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतील. पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना हा इशारा दिला आहे. आपल्या इंग्रजी भाषणात पंतप्रधानांनी युरोपियन युनियन, अमेरिका, इस्रायल, रशिया आणि चीन सारख्या देशांचेही आभार मानले आहेत. या देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादाच्या मुद्द्यावर ते भारतासोबत उभे राहिले आहेत. त्यामुळे बिहारच्या धरतीवरून थेट जगाला संदेश देण्यासाठी मोदींनी इंग्रजी भाषेचा पर्याय निवडला असल्याचे सांगितले जात आहे.