निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:56 IST2024-05-13T17:50:18+5:302024-05-13T17:56:58+5:30
Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: मी एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की 'मला दोन माता आहेत', ते सोनियाजींना आवडले नव्हते, असा किस्साही त्यांनी सांगितला.

निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक प्रचारासाठी आज रायबरेली येथे पोहोचले. तिथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यंदाच्या लोकसभेसाठी राहुल गांधीरायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. येथील सभेला संबोधित करताना त्यांनी यंदा रायबरेलीची निवड करण्याचे कारण सांगितले. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. राहुल गांधी म्हणाले की, मला दोन माता आहेत. एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. रायबरेलीत माझ्या दोन्ही मातांनी काम केले आहे. त्यामुळेच मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे.
'मला दोन माता आहेत' म्हटले ते सोनियाजींना आवडले नाही!
राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीशी माझे जुने नाते आहे आणि येथे आल्याने मला खूप आनंद होत आहे. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी असल्याने मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. एक किस्सा सांगताना राहुल गांधी म्हणाले की, मी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की मला दोन माता आहेत, एक इंदिराजी आणि एक सोनियाजी. माझ्या आईला हे आवडले नाही आणि ती म्हणाली- तुला दोन माता कशा असू शकतात? मी माझ्या आईला सांगितले की इंदिराजी यांनी माझे रक्षण केले आणि मला योग्य मार्ग दाखवला. तू देखील माझा सांभाळ करून मला चांगला मार्ग दाखवलास. म्हणूनच मला दोन माता आहेत.
लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाले?
रायबरेलीतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, आता लवकरच लग्न करावे लागेल. लोकांमधून कोणीतरी राहुल गांधींना लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाकडे राहुल गांधींनी आधी दुर्लक्ष केले आणि म्हणाले की, माझी बहीण प्रियंका गांधी इथे मला मदत करण्यासाठी आपला घाम गाळत आहे. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींचे लक्ष लग्नाच्या प्रश्नाकडे वेधले आणि म्हणाल्या- आधी या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावेळी राहुल गांधी हसत-हसत म्हणाले, आता लवकर करावंच लागेल!
काँग्रेस सत्तेत आल्यावर काय-काय करणार?
राहुल म्हणाले की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच कर्जमाफी हे पहिले काम असेल, असे राहुल गांधी म्हणाले. दुसरे काम शेतकऱ्यांसाठी कायदेशीर आधारभूत किंमत आणण्याचे असेल. तर तिसरे काम म्हणजे ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देणे असेल. त्यावेळी त्यांना लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की आता लग्न लवकरच करावे लागेल. भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी निवडणुका जिंकल्या तर संविधान बदलू, असे स्पष्टपणे सांगितले आहे. संविधानाऐवजी अदानी आणि अंबानी यांचे सरकार असेल. आरक्षण आणि तुम्हाला जे काही मिळाले आहे ते नाहीसे होईल. तुमचे मार्ग संविधान रद्द करून संपतील. हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. हा लढा शेतकरी आणि गरिबांच्या रक्षणासाठी आहे.
जनतेबाबत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष सामान्य जनतेला करोडपती करेल. भारतातील करोडो महिलांच्या खात्यात लाखो रुपये येतील. दर महिन्याला महिलांच्या खात्यात पैसे येतील. तसेच १५ ऑगस्टपर्यंत तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. भारतातील आघाडी सरकार कंत्राटी पद्धती बंद करेल. पेन्शनसह नोकरी मिळेल.