"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 02:08 PM2024-06-07T14:08:35+5:302024-06-07T17:16:57+5:30

शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. यावेळी त्यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Why silence on EVM now Narednra Modi question to the opposition in NDA Meeting | "ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

"ईव्हीएम जिंदा है की मर गया"; विरोधकांना टोला लगावत मोदी म्हणाले, "पुढची ५ वर्षे तरी..."

Narendra Modi On EVM : एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एनडीएच्या नेत्यांनी समर्थन दिलं आणि मोदींना पाठिंबा जाहीर केला. या बैठकीला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या सर्व घटकांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी येत्या १० वर्षात देशाला वेगाने विकासाच्या मार्गावर नेऊ, असं म्हटलं आहे. तसेच १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करु शकणार नाही असा टोलाही मोदींनी लगावला. तसेच ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांनाही मोदींनी यावेळी सुनावलं.

लोकसभा निवडणुकीत यावेळी एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळाले आहे. एनडीएने सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत ही कामगिरी केली आहे. त्यामुळे आता देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. शुक्रवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता ज्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी पुढच्या १० वर्षात नक्की काय करणार याबाबत खुलासा केला आहे. 

विरोधक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते

यासोबत नरेंद्र मोदी यांनी ईव्हीएमवरुन आरोप करणाऱ्या विरोधकांवर मोदींनी निशाणा साधला. "४ जूनला जेव्हा निकाल येत होते, त्यावेळी मी व्यस्त होतो. मग मला फोन येऊ लागले. मी कोणाला तरी विचारले की आकडे ठीक आहेत, पण ईव्हीएम ठीक आहेत का ते सांगा. हे लोक (विरोधक) भारतातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. मला वाटले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएमची अंत्ययात्रा काढतील. मात्र ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद  झाले. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील ५ वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही," असं नरेंद्र मोदी म्हणाले.

काँग्रेसला १०० जागांचा टप्पा गाठता आला नाही

"१० वर्षांनंतरही काँग्रेसला १०० जागांचा टप्पा गाठता आला नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुका एकत्र केल्या तर भाजपला या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या, तितक्या जागा काँग्रेसला मिळाल्या नाहीत. मी स्पष्टपणे पाहू शकतो की इंडिया आघाडीचे लोक पूर्वी हळूहळू बुडत होते, आता ते वेगाने बुडणार आहेत, असाही टोला मोदींनी लगावला.

Web Title: Why silence on EVM now Narednra Modi question to the opposition in NDA Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.