ठाणे जिल्ह्यात ५ हजार धोकादायक इमारती
By admin | Published: August 10, 2015 02:22 AM2015-08-10T02:22:58+5:302015-08-10T02:22:58+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही
पंकज रोडेकर, ठाणे
जिल्हाधिकाऱ्यांच्या २४ तासांच्या निर्देशानंतर जिल्ह्यातील एकाही महापालिकेने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची माहिती देण्याचे सौजन्य दाखविले नाही. तसेच ४८ तास उलटूनही एकाही महापालिकेने त्याबाबत माहिती न दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये सुमारे ५ हजार अतिधोकादायक आाणि धोकादायक इमारतींचे जाळे पसरल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६८३ अतिधोकादायक तर ४२८० धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे लाखोंचे जीव टांगणीला लागले आहेत.
भिवंडी अतिधोकादायकमध्ये तर धोकादायक इमारतींत ठाणे महापालिका आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईत एकही अतिधोकादायक इमारत नसली तरी धोकादायक इमारतींचा आकडा तेथे शंभरच्या घरात पोहोचला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये एक अतिधोकादायक तर ६ धोकादायक इमारती असल्याचे त्या महापालिकेने दिलेल्या माहितीत नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेनंतर ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी तातडीने सर्व महापालिकांची विशेष बैठक बोलविली होती. त्या वेळी ठाकुर्ली येथे काही दिवसांपूर्वी पडलेली इमारत आणि नौपाडा येथील इमारत दुर्घटना यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे निष्कासन करून त्यांना तात्पुरता निवारा देणे गरजेचे आहे. तसेच महापालिकांना अशा इमारती पाडण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण मिळते का, अशी विचारणा केली. पालिकांनी किती वेळा अशा रीतीने पोलीस संरक्षण मागविल्याची माहितीही (आकस्मिक आराखडा ) २४ तासांत सादर करण्याचे निर्देश त्या वेळी त्यांनी दिले होते. मात्र, एकाही महापालिकेने याबाबत २४ तासांत नाही तर ४८ तास झाल्यानंतरही माहिती सादर केली नव्हती.
नाइलाजाने अखेर जिल्हा प्रशासनानेच त्यांच्या पाठीमागे लागून माहिती गोळा केली. त्यात, ठाणे महापालिकेने २८ अतिधोकादायक इमारतींवर क ारवाई केलेली आहे. १४ इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. तर, उर्वरित १६ इमारती रिकाम्या करण्यास पोलिसांना निर्देश दिले असल्याचे सांगितले आहे.