खाडीपूल खारफुटीच्या मुळावर, हजार झुडपांची कायमची कत्तल : पूल झाल्यानंतर वाहतूक सुसाट

By नारायण जाधव | Published: December 18, 2022 07:42 AM2022-12-18T07:42:34+5:302022-12-18T07:42:41+5:30

सुमारे १ हजार ९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलासाठी चार हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे.

At the root of Khadipool mangroves, permanent slaughter of thousands of bushes: Traffic smoothed after the bridge | खाडीपूल खारफुटीच्या मुळावर, हजार झुडपांची कायमची कत्तल : पूल झाल्यानंतर वाहतूक सुसाट

खाडीपूल खारफुटीच्या मुळावर, हजार झुडपांची कायमची कत्तल : पूल झाल्यानंतर वाहतूक सुसाट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेल्या घणसोली-ऐरोली दरम्यानच्या सहा पदरी उन्नत पुलाच्या कामासाठी साडेपाच ते सहा हजार खारफुटीला हानी पोहोचणार असून यात एक हजार खारफुटी  तर कायमची तोडावी लागणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या पुलाच्या भागाचा पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना तो बांधण्यासाठी ज्या ज्या परवानगी लागणार आहेत,  त्या तत्काळ  घेण्यास सांगून या कामास वेग देण्याचा प्रयत्न केला आहे.

सुमारे १ हजार ९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलासाठी चार हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे. पूल आणि कनेक्टिंग रस्ते असे साडेतीन किलाेमीटरचे काम यात केले जाणार आहे. मँग्रोव्ह सेलने २०२१ मध्ये सादर केलेल्या रिपोर्टनुसार हा पूल दिवे, तळवली, घणसोली येथील १२,१५० चौरस मीटर वनजमिनीतून जाणार आहे.

पुलाची गरज का?
सध्या नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर रोड आणि पाम बीच रोड हे दोनच रस्ते मुंबई-ठाण्याला नवी मुंबई शहरासह येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदरास जोडतात. यामुळे दोन्ही रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडतो. 
एकात्मिक बांधकाम नियमावलीमुळे सध्याच्या एक ते दीड चटईक्षेत्रावर बिल्डरांना चार ते पाच चटईक्षेत्रापर्यंत बांधकाम करता येणार आहे. शिवाय ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील  आयटी कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
पूल झाल्यावर गर्दीच्यावेळी ५ हजार ७६६ वाहनांची दर तासाला वर्दळ वाढेल, असा अंदाज पालिकेने वर्तविला आहे. काम झाल्यावर वाहतुकीच्या वेळेत दहा मिनिटांची बचत होणार आहे. सध्या ठाणे-बेलापूर अंतर कापण्यासाठी १६ मिनिटे लागतात ते पाच मिनिटांवर येणार आहे.

इको सेन्सिटिव्ह, वनविभागाचा अडसर दूर  
हा पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर आता वनविभाग आणि इको सेन्सिटिव्हची परवानगी मिळाली आहे. यामुळे मोठा अडसर दूर झाला असून आता लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून पुलाची निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे शहर  अभियंता संजय देसाई यांनी दिली.

फ्लेमिंगोंना हानी नाही  
फ्लेमिंगोंना हानी पोहोचणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे. पुलाच्या आजूबाजूला फ्लेमिंगों पार्क विकसित करण्यात येणार आहे. शिवाय पादचाऱ्यांसाठी वॉक वे ठेवणार आहे.

वनमंत्रालय आणि सीआरझेडच्या नियमानुसार एखाद्या प्रकल्पात बाधित होणाऱ्या खारफुटीच्या पाच पट खारफुटीची लागवड इतरत्र करणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यात पर्यायी जागा मिळाली आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता,
नवी मुंबई महापालिका

Web Title: At the root of Khadipool mangroves, permanent slaughter of thousands of bushes: Traffic smoothed after the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.