कारखानदारांचे पालिकेला असहकार्य; केमिकलसाठ्याची माहिती देण्यासही नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:12 AM2018-04-28T06:12:08+5:302018-04-28T06:12:08+5:30

मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

The corporation's corporation is uncomfortable; Denial of information for chemicals | कारखानदारांचे पालिकेला असहकार्य; केमिकलसाठ्याची माहिती देण्यासही नकार

कारखानदारांचे पालिकेला असहकार्य; केमिकलसाठ्याची माहिती देण्यासही नकार

Next

नामदेव मोरे ।
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार सुरक्षा नियमांची पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागालाही सहकार्य केले जात नाही. आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी केमिकलसाठ्यांची माहितीही उपलब्ध करून दिली जात नाही. सुरक्षाविषयक निष्काळजीपणामुळे भविष्यात गंभीर दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीत खैरणे येथील पाच केमिकल कंपन्यांना २४ एप्रिलला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये चार कंपन्या जळून खाक झाल्या असून, एका कंपनीची आग वेळेत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. या घटनेनंतर राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या १०८ पैकी २४.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर एमआयडीसी वसली आहे. दिघा ते नेरुळपर्यंत साडेतीन हजारांपेक्षा जास्त कारखाने या परिसरामध्ये असून, त्यामधील २८५० कारखान्यांमध्ये विविध रसायनांचा साठा केला जात आहे. २८५ केमिकल कंपन्याही या परिसरामध्ये आहेत. या कंपन्यांमध्ये क्लोरीन, इयिलिज, एलपीजी, मोटार स्पिरिट, उच्च प्रतीचे क्लोरोसीन तेल, मेथॅनॉल, आमोनिआ, हेक्झेन, नॅफ्था, प्रापिलिजन, ब्युटीलीन, स्टायरीज, सोडिअम हायडॉक्साइड, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, क्लोरीन, ब्रोमाईन, नायट्रिक अ‍ॅसिड, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, कॉस्टिक सोडा, फर्नेस आॅइल सारख्या रसायनांचाही समावेश आहे. मागील काही वर्षांमध्ये केमिकल कंपन्यांना आग लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी आपत्कालीन आराखडा तयार करते. आपत्कालीन आरखडा बनविण्यासाठी सर्व कारखानदारांकडून त्यांच्याकडील केमिकलसाठ्याची माहिती मागवत असते. केमिकलच्या साठ्याचे प्रमाण, आपत्ती उद्भवल्यास काय उपाययोजना केल्या आहेत, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी माहिती देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे; परंतु एमआयडीसी प्रशासन व कारखानदार माहिती उपलब्ध करून देत नाहीत.
आपत्कालीन आराखडा बनविण्यासाठी कारखानदार सहकार्य करत नाहीत. वास्तविक प्रत्येक कारखान्यामध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर केमिकलसाठ्याविषयीचा तपशील देणे आवश्यक आहे. रोजच्या साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर असल्यास आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे तत्काळ लक्षात येऊ शकते. एखाद्या कंपनीला आग लागल्यास त्या कंपनीमध्ये कोणते केमिकल व किती प्रमाणात आहे, याची माहिती आपत्कालीन विभागाला पटकन लक्षात येईल व आग विझविण्यासाठी ठोस उपाययोजना करता येऊ शकते; परंतु याविषयी कोणतीच माहिती कारखानदार देत नसल्यामुळे आग विझविण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.

महापालिकेचा पाठपुरावा
नवी मुंबई महानगरपालिकेने एमआयडीसी व कारखानदारांकडे त्यांच्याकडील केमिकल साठ्याचा तपशील देण्याच्या सूचना वारंवार केल्या आहेत. आपत्कालीन आरखडा तयार करण्यासाठी केमिकलसाठ्याचा तपशील आवश्यक आहे, यासाठी वारंवार मिटिंग घेऊन व पत्रे दिली आहेत; परंतु कारखानदारांकडून अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

नवी मुुंबईमधील रासायनिक कारखान्यांमध्ये नक्की किती केमिकल आहे, याची माहितीच उपलब्ध नाही. साठ्याची माहितीच नसल्याने सुरक्षेसाठी आवश्यक काळजी घेता येत नाही. भविष्यात ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भोपाळसारखी मोठी दुर्घटना या परिसरामध्ये होऊ शकते.

रोडवर टँँकरची पार्किंग
नवी मुंबईमध्ये जवळपास १५०० टँकरमधून रसायनांची वाहतूक केली जाते. रसायनांनी भरलेले व मोकळे टँकर रोडच्या दोन्ही बाजूंना उभे केले जात आहेत. बोनसरी परिसरामध्ये जवळपास एक किलोमीटरपर्यंत टँकरची रांग लागलेली असते. भविष्यात या टँकरला इतर वाहनांची धडक बसून, स्फोट होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

Web Title: The corporation's corporation is uncomfortable; Denial of information for chemicals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग