घणसोली नाल्याच्या काठावर संस्कृती उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:12 AM2017-07-20T04:12:14+5:302017-07-20T04:12:14+5:30
केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत घणसोली नाल्याच्या काठावर हरित क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संस्कृती या संकल्पनेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या अमृत अभियानाअंतर्गत घणसोली नाल्याच्या काठावर हरित क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. संस्कृती या संकल्पनेवर आधारित हे उद्यान विकसित केले जाणार असून १ कोटी ५२ लाख रुपयांच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
घणसोली नोड हस्तांतर केल्यानंतर तेथील रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सेक्टर ९ मधील घरोंदा सोसायटीला लागून असलेल्या नैसर्गिक नाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नाल्यातील दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरू लागली होती. परंतु आता हाच नाला या परिसराचे वैभव वाढविणार आहे. नाल्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये वृक्ष लागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी असिम गोकर्ण हरवंश यांच्याकडून प्रकल्प अहवाल तयार करून घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १ कोटी ५० लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ५० टक्के रक्कम केंद्र शासन, २५ टक्के राज्य शासनाच्या अनुदानातून व उरलेली २५ टक्के रक्कम महापालिकेच्या निधीतून खर्च करावयाची आहे.
या प्रकल्पाची संस्कृती या संकल्पनेवर आधारित रचना करण्यात आली आहे. शहरातील हरित आच्छादन वाढविण्याचा उद्देश आहे. नाल्याच्या बाजूला बेल, रूद्राक्ष, पंगारा, अशोक, पारिजात, पळस, नारळ, सुपारीचे वृक्ष लावण्यात येणार आहेत. याशिवाय विविध प्रकारच्या वेलीही लावण्यात येणार आहे. नागरिकांना फिरता यावे यासाठी पदपथ, बैठक व्यवस्थेसह इतर कामे केली जाणार आहेत. सर्वसाधारण सभेने १ कोटी ५२ लाख रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. शिवसेनेचे नामदेव भगत यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादीच्या दिव्या गायकवाड यांनी इतर विभागातही अशाप्रकारे ग्रीनबेल्ट विकसित करावे, अशी मागणी केली आहे.
घणसोलीत उद्यान नाही. नाल्यालगतचा संपूर्ण भाग हरित पट्टा म्हणून विकसित करण्यात यावा. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ७५ टक्के रक्कम मिळणार आहे. हरित पट्टा विकसित करताना वृक्षांना मलनि:सारण केंद्रातील शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचा वापर करण्यात यावा.
- द्वारकानाथ भोईर,
गटनेते, शिवसेना