मुसळधार पावसामुळे शहरातील मुक्या प्राण्यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:54 AM2017-07-18T02:54:55+5:302017-07-18T02:54:55+5:30
पावसाळा सुरू झाल्यापासून आजार वाढीस लागतात. माणसांबरोबरच मुक्या जीवांमध्येही विविध प्रकारच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून
- प्राची सोनवणे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून आजार वाढीस लागतात. माणसांबरोबरच मुक्या जीवांमध्येही विविध प्रकारच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरातील ४०० हून अधिक मुक्या जीवांना प्राणीप्रेमी संस्थांकडून उपचार करण्यात आले आहेत तर १०० अधिक मुक्या जीवांना प्राण गमवावे लागले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह असलेल्या पावसामुळे झाडे उन्मळून पडत आहेत आणि झाडांवर निवारा असलेले मुके जीव मात्र बेघर होत असल्याने शहरातील प्राणीपे्रमी या मुक्या जीवांना जीवनदान देण्याकरिता पुढे सरसावल्या आहेत.
पावसाळ््यात पशू-पक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढले असून भिजल्याने तसेच डिहायड्रेशनमुळे देखील या मुक्या जीवांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याची माहिती प्राणीप्रेमी संस्थांकडून दिली जात आहे. पावसाच्या तडाख्याने झाडे पडल्याने पक्ष्यांची घरटी मोडली असून ते बेघर झाले आहेत. असे पक्षी मानवी वस्तीत आसरा घेत आहेत त्यामुळे पावसात भिजलेल्या पक्ष्यांना घराच्या खिडकीत निवारा देण्याचे आवाहन प्राणीप्रेमींनी केले आहे. पावसात भिजल्याने न्यूमोनिआचे आजार होत असल्याने या पक्ष्यांना ऊब मिळणे आवश्यक आहे त्याकरिता नागरिकांनी प्राणीप्रेमी संस्थांना मदत करणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया संस्थेच्या स्वयंसेवकांनी व्यक्त केली आहे. पनवेल परिसरातील बऱ्याचशा भागांमध्ये गाय, बैल यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात गंभीर जखमी प्राण्यांना अथवा पक्ष्यांना या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जात असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सागर सावला यांनी दिली.
पावसाच्या फटक्याने नवी मुंबई तसेच पनवेल परिसरातील जखमी पशू-पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली असून या प्राणीप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने दिवसभरात दहापेक्षा अधिक मुक्या जीवांवर उपचार केले जातात. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने नाले, तलाव भरून वाहत आहेत. त्यामुळे रस्त्यावर येणारे सरपटणारे प्राणी जखमी होत असून पावसाच्या सरींचा फटका बसून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडत आहेत. मुसळधार पावसात कुत्रे, मांजर रस्त्यावर येऊन वाहनांच्या धडकेत जखमी होत असल्याच्या घटनाही वाढत झाल्याची माहिती प्राणीप्रेमी संस्थांनी दिली आहे. वातावरणातील बदलामुळे पशू-पक्ष्यांना अशक्तपणा येत असून त्यांना टॉनिक, लसीकरण, मलमपट्टी असे औषधोपचार केले जातात.
नवी मुंबईतील भूमी जीवदया संवर्धन ट्रस्टच्या वतीने अशा पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला जात असून त्यांच्यावर मोफत उपचार केले जात आहेत. याठिकाणी एकाचवेळी १००० मुक्या जीवांवर उपचार केले जातात. संस्थेच्या वतीने त्वरित रुग्णवाहिका पोहोचवून तेथील जखमी मुक्या जीवांवर उपचार केले जातात. यामध्ये घार, घुबड, कबुतर, पोपट, सरपटणारे प्राणी,मांजरीची पिल्ले,कुत्रे यांचा समावेश आहे.