पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य?

By नारायण जाधव | Published: February 28, 2024 05:51 PM2024-02-28T17:51:05+5:302024-02-28T17:51:31+5:30

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे.

Environment director invalidated the existence of five water bodies in Thane district? | पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य?

पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य?

नवी मुंबई : देशातील २.२५ हेक्टरपेक्षा जास्त आकाराच्या दोन लाख एक हजार पाणथळींचे संरक्षण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सक्त आदेश असताना त्याना अव्हेरून महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांनी नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील एका पाणथळीच्या संरक्षणाबाबत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईतील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ ही एकमेव पाणथळीचे क्षेत्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांचा हा दावा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचित केलेल्या जिल्हाभरातील पाणथळींचे अस्तित्व अमान्य करणारा असल्याचे सांगून याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यावरण संचालकांना २० जून २०२२ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार, ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या १३२ असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या ६ आणि अधिसूचित न केलेल्या पाणथळींची संख्या १२१ इतकी आहे.

केंद्राने सूचित सहा पाणथळी

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे.

पर्यावरण संचालकांचा दावा दिशाभूल करणारा

नवी मुंबईतील नेरूळ येथील लोटस तलावाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई ही एकमेव पाणथळ क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा दावा पूर्णत: न्यायालयाची दिशाभूल करणारा असल्याचे नवी मुंबईतील पाच बीच रोडवरील २० हेक्टर एनआरआय पाणथळ आणि १३ हेक्टर टीएस चाणक्य पाणथळींसाठी लढा उभारणारे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल आणि श्रुती अगरवाल यांनी म्हटले आहे. आमच्या लढ्यामुळेच आज नवी मुंबईत येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या सहा पाणथळींची माहिती २०१७ मध्येच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यानंतर ठाणे खाडी परिसराला जागितक दर्जाच्या रामसर क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. याचा कोणताही उल्लेख पर्यावरण संचालकांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात केलेला नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. कमीत कमी त्यांनी या सर्वांचा उल्लेख तरी त्यात करायला हवा होता. पर्यावरण विभागाच्या अशा धोरणांमुळेच नवी मुंबई, रायगडसह ठाणे जिल्ह्यातील पाणथळी नष्ट हाेत चालल्या आहेत. त्यांचे हे बिल्डरधार्जिणे धोरण मानवजातीला एक दिवस खूप महागात पडेल.
-सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई

Web Title: Environment director invalidated the existence of five water bodies in Thane district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.