नवी मुंबई : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक आला असून, राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. हा नवी मुंबईकरांचा बहुमान आहे. भविष्यात अजून लोकाभिमुख सुविधा पुरवून स्वच्छतेसह सर्वच क्षेत्रात शहरास प्रथम क्रमांकावर घेवून जाण्याचा निर्धार महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईचा स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये देशात तिसरा क्रमांक आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पत्रकार परिषद घेवून पालिकेच्या धोरणांविषयी माहिती दिली. दोन दशकांच्या वाटचालीमध्ये महापालिकेने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयांमुळे शहराचा नावलौकिक देशभर वाढला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे. मोरबे धरणामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य झाले आहे. शहराची लोकसंख्या १२ लाख असून ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करता येईल एवढी धरणाची क्षमता आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या शहरात मलनिस्सारण केंद्रातील पाणी समुद्र किंवा नदीमध्ये सोडून दिले जात आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने सहा अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्रे उभी केली असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह बहुतांश सर्व शहरांना डम्ंिपग ग्राउंडचा प्रश्न भेडसावत आहे. नवी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक क्षेपणभूमी तयार केली आहे. त्यामध्ये खतनिर्मितीही केली जात आहे. आदर्श प्रकल्प उभा केला आहे. कचरा वाहतुकीची समस्याही आता सुटली आहे. पाणी, मलनिस्सारण केंद्र, घनकचरा व्यवस्थापन यासाठी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच शहराला स्वच्छतेसाठी तिसरा क्रमांक मिळाला आहे. यावेळी माजी महापौर सागर नाईक, आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, माजी सभागृह नेते अनंत सुतार, डॉ. जयाजी नाथ, शहर अभियंता मोहन डगावकर उपस्थित होते. पुरस्कार मिळवून देणारे प्रकल्प महापालिकेने नेरूळ व वाशीमध्ये १०० दशलक्ष लिटर क्षमतेचे अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. ऐरोलीमध्ये ८०, कोपरखैरणेमध्ये ८७, सानपाडामध्ये ३७ व सीबीडीमध्ये १८ दशलक्ष लिटर क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र उभारले आहे. सर्व केंद्रांची क्षमता ४२४ दशलक्ष लिटरची आहे. शहरात ३४१ किमीच्या भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकल्या आहेत. पाणीपुरवठा स्वातंत्र्यानंतर धरण विकत घेणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. शहरात ६६८ लांबीची पाइपलाइन करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. चोवीस तास पाणीपुरवठा करणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. मोरबे धरणामुळे पुढील तीस वर्षांत शहरास पाण्याचा तुटवडा भासणार नाही. क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड)मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवली व इतर अनेक शहरांना डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न भेडसावत आहे. परंतु नवी मुंबई महापालिकेने अत्याधुनिक क्षेपणभूमी तयार केली आहे. शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. लिचेट ट्रिटमेंट प्लँट तयार केला आहे. कचऱ्यातून प्लास्टिक वेगळे केले जात आहे. कोपरखैरणेमधील क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करून तेथे उद्यान फुलविण्यात आले आहे.
देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट
By admin | Published: August 11, 2015 3:32 AM