अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीपनवेल-सायन महामार्ग, जवळच असलेल्या खांदेश्वर व मानसरोवर रेल्वे स्थानकांमुळे कामोठे वसाहतीला महत्त्व प्राप्त झाले. नोडमध्ये मोठमोठ्या इमारती उभा राहिल्या असल्या तरी खांदेश्वर व मानसरोवर ही स्थानके मात्र असुविधांच्या फेऱ्यातून अद्याप बाहेर पडलेली नाहीत. दोन्ही स्थानकांत पुरेशा सोयीसुविधा नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. यासाठी सिडको तसेच रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. २० वर्षांपूर्वी पनवेल परिसरात उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. २००८ साली मानसरोवर स्थानक विकसित करण्यात आले. नागरिकांना खांदेश्वर, मानसरोवर ही स्थानके दळणवळणासाठी सोयीची पडू लागल्याने या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. दोन्ही उपनगरीय रेल्वे स्थानके कामोठे वसाहतीच्या हद्दीत आहेत. बाजूलाच सिडकोने कामोठे नोड विकसित केला आहे. दोन्ही रेल्वे स्थानकांतून दररोज ५० हजारांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करीत असले तरी त्यांना पुरेशा सुविधा नाहीत. स्थानकातील पंखे तुटलेले आहेत. इंडिकेटर्स बहुतांश वेळा बंदच असतात. या ठिकाणी स्वच्छतेचाही बोजवारा उडला आहे. अनेकदा स्थानकातील, सबवेमधील वीजपुरवठा खंडित असतो. पायऱ्यांवरील रेलिंगही तुटलेले आहेत. त्यामुळे प्रवासी अडखळतात. सध्या उन्हामुळे काहिली होत असली तरी खांदेश्वर रेल्वे स्थानकातील सर्व पाणपोई बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानक परिसरात बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयात पाणी येत नाही. मानसरोवर रेल्वे स्थानकातील फलाटावर लावण्यात आलेल्या पाणपोई पाण्याअभावी धूळखात पडल्या आहेत. दोन्ही रेल्वे स्थानक परिसरातील विजेचे दिवे ५० टक्के बंद असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानके अद्याप सिडकोकडे असल्याने पायाभूत सुविधा पुरविणे सिडकोची जबाबदारी आहे. याबाबत आम्ही सिडकोकडे सातत्याने पत्रव्यवहार करतो, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. आम्हाला प्रवाशांच्या तक्र ारीला तोंड द्यावे लागते.- भूप सिंग, रेल्वे अधिकारी
रेल्वे स्थानकांत सुविधांचा अभाव
By admin | Published: March 21, 2016 2:01 AM