प्राची सोनवणे , नवी मुंबईस्वच्छतेत देशात तिसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहरात ध्वनिप्रदूषणाने मात्र कळस गाठला आहे. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सायलेन्स झोनचे फलक केवळ नावापुरतेच उरले आहेत. ध्वनी प्रदूषण निषिध्द असलेल्या या परिसरातही शांतता भंग केली जात आहे. सायबर सिटीत महापालिकेने एकूण ६४ शांतता क्षेत्रे घोषित केली आहेत. यात १२ हॉस्पिटल्स, ५१ शाळा व महाविद्यालये आणि एका वृध्दाश्रमाच्या परिसराचा समावेश आहे. यापैकी १६ ठिकाणी सर्वाधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आले आहे. सायलेन्स झोन म्हणून घोषित केलेल्या परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रुग्णालयातील रुग्ण, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी यांना कर्कश आवाजांचा त्रास होवू नये, या दृष्टीने या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्यातीत तरतुदीनुसार सायलेन्स झोन परिसरात १०० मीटर अंतरापर्यंत हॉर्न वाजविण्यास मनाई आहे. तसेच या शांतता क्षेत्रांत मोठमोठ्याने वाद्ये वाजविणे, फटाके फोडणे यास सक्त मनाई आहे. मात्र नवी मुंबईत या नियमाला सपशेल हरताळ फासण्यात येत आहे. सायलेन्स झोनच्या फलकांकडे दुर्लक्ष करीत वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवतात. नियमानुसार सकाळच्या वेळी ५० डेसिबल तर रात्रीच्या वेळी ४० डेसिबल अशी आवाजाची मर्यादा ठरवून दिलेली आहे.सायबर सिटीत आवाज ़निषिध्द क्षेत्रामध्ये सकाळी ५० डेसिबलहून अधिक तर रात्री ४० डेसिबलहून अधिक प्रमाणात ध्वनिप्रदूषणाची नोंद केली जात आहे.
शांतता क्षेत्रेही अशांतच
By admin | Published: August 10, 2015 2:27 AM