पोलिसांचा समन्वय वाढला

By Admin | Published: August 23, 2015 03:49 AM2015-08-23T03:49:46+5:302015-08-23T03:49:46+5:30

शहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे

Police coordination increased | पोलिसांचा समन्वय वाढला

पोलिसांचा समन्वय वाढला

googlenewsNext

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
शहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे शाखेने कमालीचे यश मिळवलेले आहे.नवी मुंबई पोलिसांच्या इतिहासात यंदा प्रथमच परिमंडळ व गुन्हे शाखा यांच्यात समन्वय दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलिसांना आलेली मरगळ झटकण्याचे काम गुन्हे शाखेने मागील वर्षभरापासून केले आहे. नवी मुंबईला लागून असलेल्या शहरातील गुन्हेगारांची पोलिसांना मोठी डोकेदुखी आहे. गुन्हे करून शहराबाहेर पळालेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा, आंबिवलीसारख्या परिसरात त्यांनी धाडी टाकल्या. काही कारवायांमध्ये गुन्हेगारांच्या प्रतिहल्ल्यालाही त्यांना सामोरे जावे लागले. परंतु काही केल्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचेच या उद्देशाने पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवले. त्यामुळे सोनसाखळी, घरफोडी व इतर गंभीर गुन्हे नियंत्रणात आले आहेत. तर घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्यामुळे चोरीचा मुद्देमालही हस्तगत झालेला आहे. सन २०१२ साली ३२२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी अवघ्या १३६ गुन्ह्यांची उकल झालेली. परंतु २०१४ मध्ये झालेल्या २९७ सोनसाखळी चोऱ्यांपैकी १६८ गुन्ह्णांची उकल गुन्हे शाखेने केलेली आहे. तर चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत ११४ घटना घडल्या असून त्यापैकी ६२ गुन्ह्णांची उकल झालेली आहे.
सोनसाखळी चोरीच्या घटनाही मध्यंतरीच्या काळात वाढलेल्या होत्या. मात्र त्यावरही नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. १ आॅगस्ट २०१४ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत सोनसाखळी चोरीच्या १०१ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. त्यामध्ये ४४ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी परत मिळवून संबंधित महिलांना दिलेले आहेत. अशाप्रकारे इतर विविध गुन्ह्यातील ८ कोटी ८७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामध्ये मालमत्तेच्या अपहारासह खंडणी, फसवणूक अशांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात राबवलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्येही पोलिसांनी राज्यात चौथ्या क्रमांकाचे तपासकार्य केले आहे. या अभियानादरम्यान ४६ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोचवले आहे. तर पालक न मिळालेल्या ८ बालकांना सुधारगृहात ठेवले आहे. हत्येच्या गुन्ह्णांची उकल करण्यात कसलीही कसर न सोडता पुराव्याअभावी देखील अनेक संवेदनशील गुन्ह्यांची
उकल केलेली आहे. त्यामध्ये महिला बाल संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरण, सीबीडी स्थानकालगत आढळलेले मृतदेहाचे तुकडे, ऐरोलीचे फ्रेन्शिला वाझ हत्या प्रकरण अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचेही गांभीर्य लक्षात घेऊन उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान राबवण्यात आले.

आयुक्तांची भूमिका
गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांमध्येच समन्वय असण्याची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन परिमंडळ उपआयुक्त व गुन्हे शाखा उपआयुक्त यांनी आपसात सलोखा साधलेला आहे. योग्य समन्वया साधण्यात आयुक्तांचीही भूमिका मार्गदर्शक ठरलेली आहे.
इथल्या इंटरनेट सुरक्षेवरही त्यांनी भर दिला. यापूर्वी शहरातून दहशतवादी कारवाईशी संबंधित ई-मेल पाठवले गेलेले आहेत. त्यामुळे धोक्यात आलेली वायफायची सुरक्षा बळकट करण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे अभियान राबवण्यात आले.

सराईत गुन्हेगारांच्या मागे लागून अनेकांची धरपकड केलेली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्णांची उकल झालेली असून त्यामध्ये पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये सामाजिक हिताच्या बाबीही जोपासण्याचे काम पोलिसांनी केलेले आहे. सहकारी अधिकाऱ्यांमध्ये साधलेला समन्वय हा तपासकामात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे.- सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Police coordination increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.