नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ आल्यानंतर अनेक रखडलेली कामे सुरू झाली आहेत. परंतु यानंतरही अनेक समस्या अद्याप कायम आहेत. मसाला, भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. मसाला मार्केटमध्ये पोलीस चौकीकडील आवक गेटवर मोठा खड्डा पडला असून तो बुजविला जात नसल्यामुळे वाहनांना ये - जा करता येत नाही. भाजी मार्केटकडील गेटवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा रस्ता महापालिकेच्या अखत्यारीत येत असून पालिका प्रशासनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. महत्त्वाच्या मार्केटमधील या समस्यांमुळे वाहनधारकांसह व्यापारी व कामगारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भाजी व फळ मार्केटच्या प्रवेशद्वारांचे रखडले आहेत. दोन्ही मार्केटमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. परंतु रस्त्याच्या पातळीशी समांतर केले नसल्यामुळे पावसाचे पाणी गेटवर साचते. पाणी गटारात जाण्यासाठीची सोयच करण्यात आली नाही. मार्केटमध्ये प्रवेश करतानाच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)
बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर खड्डे
By admin | Published: August 12, 2015 1:10 AM