पोलीस दलातील रणरागिणींचा सत्कार
By admin | Published: August 13, 2015 12:32 AM2015-08-13T00:32:22+5:302015-08-13T00:32:22+5:30
नेरूळमधील पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका केली होती. दुसऱ्या राज्यात जाऊन अशाप्रकारे पीडित मुलींची सुटका करण्याचे हे एकमेव
नवी मुंबई : नेरूळमधील पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील कुंटणखान्यातून २१ मुलींची सुटका केली होती. दुसऱ्या राज्यात जाऊन अशाप्रकारे पीडित मुलींची सुटका करण्याचे हे एकमेव उदाहरण असल्यामुळे ही कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेमध्ये सत्कार करण्यात आला.
राज्यातील विविध भागामधील मुलींना पळवून नेवून आग्रा येथील कुंटणखान्यात ठेवण्यात आले होते. नवी मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नेरूळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम आग्रा येथे गेली आणि २१ मुलींची सुटका केली. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महापालिकेच्या वतीने या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांनी केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण आणि तितकीच कौतुकास्पद असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन राबविण्यात आले. महापालिकेने केलेल्या सत्कारामुळे पोलीस दलाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे मतही व्यक्त केले. यावेळी या मोहिमेत सहभागी झालेले सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ मजगे, सहायक निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सचिन हिरे, दीपक डोंब, साहेबराव भोसले, भाऊसाहेब लोंढे, श्रीकांत उबाळे, ए.आर. साळुंखे, मंगेश पाटील, राजू भांगरे, सुवर्णा कांदळकर, अर्चना पाटील व सोनाली गोडसे यांचा सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)
सत्कार सभागृहात झाला पाहिजे : विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. नवी मुंबईकरांना या बहादूर पोलिसांचा अभिमान आहे. त्यांचा यथोचित सन्मान महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केला पाहिजे. अभिनंदनाचा विशेष प्रस्ताव मांडणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.