ठाणे - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्रपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. विशेष, म्हणजे पतीला वीरमरण प्राप्त होऊन एक वर्षही उलटले नाही, तोपर्यंतच कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते मीरा रोड येथील शितल नगर येथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. या वृत्ताने मुंबईसह महाराष्ट्रावर हळहळला होता. तर राणे कुटुंबीयांचा अभिमानही अवघा देश बाळगत होता. आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना जाऊन अजून वर्षही झालं नाही. येत्या 7 ऑगस्टला त्या घटनेला एक वर्ष होईल. पतीच्या निधनाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या अकाली निघून जाण्याच्या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
देशासाठी सैन्य दलात भरती होण्याची लहानपणा पासुनच आवड होती. कौस्तुभला देशासाठी अजुन खुप काही करायचे होते. त्याचे स्वप्न लष्करात जाऊन मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं कनिका म्हणाल्या . आपलं लहान मुल आणि पत्नी मागे असताना देखील कौस्तुभने आधी देशाचा विचार केला. आपल्या वडिलांनी देशासाठी सैन्यात दाखल होऊन जे केले ते लहानगा अगस्त्य पाहु शकला नाही. पण आपली आई देशासाठी सैन्यात दाखल होऊन काय करतेय हे तो प्रत्यक्ष पाहिल तेव्हा त्याला सैनिक काय हे कळेल असं कनिका म्हणाल्या.
पतीच्या निधनानंतर वीरपत्नी कनिका राणे, यांच्या त्यागाला, संघर्षाला आणि ध्येयवादाला नक्कीच सॅल्यूट करायला हवा...!