लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. बुधवारी तुर्भे पुुलावर रुग्णवाहिका अडकून पडली होती. रुग्णवाहिकेलाही मार्ग उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुंदीकरणासाठी १२२० कोटी रुपये खर्च करूनही सायन - पनवेल महामार्गाच्या समस्या सुटण्याऐवजी वाढल्या आहेत. पूर्ण महामार्ग खड्ड्यांत गेला असून रोज वाहतूककोंडी होत आहे. जुईनगरकडून सानपाडाकडे येताना दत्तमंदिरजवळील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होवू लागली आहे. बुधवारी दुपारपासून पुलापासून जुईनगरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. यामध्ये पनवेलवरून रूग्ण घेवून आलेली रूग्णवाहिकाही अडकली होती. रूग्णवाहिकेला जाण्यासाठीही जागा उपलब्ध नव्हती. महामार्गावर रोजच वाहतूक कोंडीमध्ये रूग्णवाहिका अडकून पडत आहे. अशा स्थितीत एखाद्या रूग्णाचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वाहतूककोंडीचा रुग्णांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 4:11 AM