गॅरेजचालकांनी अडविला तुर्भे मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:37 AM2017-07-21T03:37:56+5:302017-07-21T03:37:56+5:30
वाशी-तुर्भे मार्गावर ट्रक टर्मिनलजवळील गॅरेजचालकांनी मुख्य रोडवर वाहने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, वाहतूककोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशी-तुर्भे मार्गावर ट्रक टर्मिनलजवळील गॅरेजचालकांनी मुख्य रोडवर वाहने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर पालिका व वाहतूक पोलीस काहीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरात गॅरेजचालकांच्या अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. व्यावसायिकांकडून रस्ते व पदपथ अडविले जात आहेत. वाशी-तुर्भे मुख्य रोडवर ट्रकटर्मिनल आवारातील गॅरेजचालकांनी व्यवसाय सुरू केला आहे. दुरुस्तीसाठी आलेले ट्रक सर्व्हिस रोड व मुख्य रोडवरील एक लेनवर उभे केले जात आहेत. याच ठिकाणी बिनधास्तपणे दुरुस्तीची कामे केली जात आहेत. या अतिक्रमणामुळे तुर्भेकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. यापूर्वी याच परिसरामध्ये मोटारसायकलच्या धडकेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या रोडवर अरेंजा सर्कलजवळ वाहतूक पोलीस चौकी असून, पुढे अन्नपूर्णा चौकामध्ये मुख्य वाहतूूक चौकी आहे; परंतु वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्यांवर काहीही कारवाई केली जात नाही.
या परिसरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची पाच मार्केट आहेत. याशिवाय ट्रक टर्मिनल असल्याने रोज तीन ते चार हजार ट्रकची वर्दळ सुरू असते. रोडवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, महापालिकेच्या विभाग कार्यालयानेही कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण ढेबे यांनी केली असून याविषयी पालिका व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.