मेघराज जाधव, मुरूडयंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विहूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विहूर धरणातील पाणी आटल्याने विहूरसह मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकवाडा, नांदगाव मोहल्ला व कोळीवाडा गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल, मे महिन्यात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे. मुरुड तालुक्यात गतवर्षी १३० इंचाहून अधिक पर्जन्यमान होते. यंदा हे प्रमाण जेमतेम ९४ इंचापर्यंत पोहोचले. तालुक्यात ७३ गावे ३७ वाडे पाडे असून, २४ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. मुरुड शहराची लोकसंख्या १२ हजार ७७०, तर उर्वरित गावांची लोकसंख्या ६१ हजार ७४७ एवढी आहे. नळपाणी योजनेंतर्गत भारत निर्माण योजनेतून ११ मंजूर कामांपैकी ८ कामे पूर्ण तर ३ प्रगतिपथावर आहेत. शिवकालीन दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण असून, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील ८ पैकी ५ कामे पूर्ण, तर ३ अपूर्ण आहेत. विहूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले धरण यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भरले नाही. केवळ ५० टक्केच पाणीसाठा होऊ शकला. धरणाला नदी वा गाणी (नैसर्गिक पाझर) यासारखे अन्य स्रोत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जेवढा जलसाठा होईल त्यावरच विहूर, मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकपाडा, नांदगाव मोहल्ला, कोळीवाडा व नबाबाच्या पॅलेसला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने येत्या एप्रिल, मे महिन्यात टँकर वा विंधण विहिरींशिवाय पर्याय नाही. येथील ग्रामस्थ तला कचकोन तसेच एजाज पांगारकर यांच्या मते, विहूर धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अव्यवहार्य आहेत. त्याचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. तसेच मजगाव ग्रामपंचायतीच्या जलवाहिन्यांची देखभाल नीट होत नसल्याने पाणी वाया जाते, अशीही माहिती मिळाली. विहूर धरणाचा पाणीसाठा जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल. पाण्यावर नियंत्रण आणले तर ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागतो. येत्या एप्रिल, मे महिन्यात प्रशासनाने टँकर, विंधण विहीर उपलब्ध करून घ्याव्यात. यापेक्षा अंबोली धरणातून ५ इंचाची जलवाहिनी जोडून द्यावी.- इकरार मोदी, सरपंच, विहूरयंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. विहूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. जनतेने गाळ उपसून न्यावा, जेणेकरून धरणाची खोली वाढेल. मात्र त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.- पंडित पाटील, आमदार
विहूर धरणातील पाणी आटले
By admin | Published: March 21, 2016 1:43 AM